दिल्ली : सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात दिल्लीच्या एका न्यायालयाने काँग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. सुनंदा पुष्कर यांच्या आत्महत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. शशी थरुर यांनी घरगुती हिंसाचार केला, तसेच सुनंदा यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला होता. सुनंदा पुष्कर या शशी थरुर यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या.
सुनंदा पुष्कर यांनी मृत्यूच्या काही दिवस अगोदर पती शशी थरूर यांना ईमेल केला होता. त्यात लिहिले होते कि, “माझा जगण्यातील रस संपला आहे. मृत्यू यावा अशीच माझी प्रार्थना आहे.” परंतु, पत्नी डिप्रेशनमध्ये असूनही शशी थरुर यांनी काहीच केलं नाही. थरुर यांनी सुनंदा यांच्या मृत्यूअगोदर पत्नीचे फोन कट केले किंवा उचलले नाहीत. दाम्पत्यामध्ये भांडणं होत असल्याचं समोर आलं होतं’ असं निरीक्षण चौकशी पथकाने आरोपपत्रात नोंदवलं होतं. त्या काहीही खात नव्हत्या, रुमबाहेर पडत नव्हत्या, असा उल्लेख चार्जशीटमध्ये होता.
शशी थरुर यांचे पाकिस्तानी पत्रकार मेहर तरारसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप सुनंदा पुष्कर यांनी सोशल मीडियावरुन केला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला होता. सुनंदा यांनी 2010 मध्ये शशी थरुर यांच्यासोबत लग्न केलं होतं. हा त्यांचा तिसरा विवाह होता. १७ जानेवारी २०१४ रोजी चाणक्यपुरी मधील पंचतारांकित हॉटेल लीला पॅलेसमधील खोली क्रमांक ३४५ मध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह आढळला होता. संशयास्पद परिस्थितीत झालेल्या या मृत्यूने मोठी खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नियुक्त करण्यात आली होती.




