नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या लाटेत अनेक जणांनी प्राण गमावले. त्यातच आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आयआयटी कानपूरच्या प्राध्यापकांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. आयआयटीचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी दावा केला आहे की तिसरी लाट दुसर्या लाटेपेक्षा कमी प्राणघातक असेल. ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल म्हणाले की, तिसर्या लाटाचे मूल्यांकन करण्यासाठी आम्ही गेल्या एका महिन्यात आमच्या मॉडेलच्या माध्यमातून बरीच गणना केली आहे. यात असे दिसून आले आहे की तिसरी लाट दुसर्या लाटेइतकी प्रभावशाली नसेल. यात आम्ही तीन शक्यता वर्तवल्या आहेत. ऑगस्टच्या अखेरीस एखादा नवीन व्हेरिएंट आला, जो डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक वेगाने पसरेल, तर ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान तिसरी लाट येईल. त्यानुसार तिसरी लाट पहिल्या लाटेप्रमाणे असेल.
प्रोफेसर अग्रवाल यांनी सांगितले की डेल्टा व्हेरिएंटमुळे तिसरी लाट भारतात येईल, अशी शक्यता कमी आहे. डेल्टा व्हेरिएंटपेक्षा वेगाने पसरणारा एखादा नवीन प्रकार भारतात आला तर काही प्रमाणात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. आम्ही दोन गोष्टी विचारात घेतल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना संसर्ग झाला आहे ते बरे झाले. त्यांच्यातील काही लोकांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. 5 ते 20 टक्के लोकांची प्रतिकारशक्ती संपली असून त्यांना पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता आहे.




