मुंबई : तीन जणांनी भररस्त्यात एका वकिलावर काठ्या आणि तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी भररस्त्यात या वकिलावर तलवारीने वार केले. तसेच काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वकिल सत्यदेव जोशी या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना काल (१८ जुलै) दुपारी घडली आहे. दरम्यान, हा हल्ला झाल्यानंतर आसपासच्या लोकांनी जोशी यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता या आरोपींनी त्यांच्यावर देखील हल्ला केला, ज्यात काही लोकांना जखमा झाल्या आहेत. वकिल सत्यदेव जोशी संधी साधून तेथून निसटले, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. सध्या त्यांच्यावर जुहूमध्ये एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, वकिल सत्यदेव जोशी यांनी एमएचबी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी व्हिडीओच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवून तीन जणांना अटक केली आहे. एमएचबी पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध कलम 307, 326, 324, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.




