भाजपनेते टी. राजा सिंह यांनी फेसबुकवर आणि जाहीरपणेही रोहिंग्या मुस्लीमांना गोळ्या घातल्या पाहिजेत असे म्हटले होते. मुस्लीम देशद्रोही आहेत, मशिदी उद्ध्वस्त केल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले होते.
भारतामध्ये फेसबुकनं या पेजेसवर कारवाई करण्यास नकार दिल्याचं वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलनं प्रसिद्ध केलं होतं. या वृत्तावरून फेसबुकच्या भूमिकेबद्दल नवा वाद निर्माण झाला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलनं वृत्तात म्हटलं होतं की, “फेसबुक-इंडियाने भाजप नेत्यांची प्रक्षोभक भाषणे आणि आक्षेपार्ह मजकूर नियमांनुसार काढून टाकले नाहीत. फेसबुकसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ असून सत्ताधारी पक्षाला दुखावल्यास कंपनीच्या व्यावसायिक हितावर विपरित परिणाम होईल, या भीतीपोटी भाजपनेत्यांचा विद्वेषी मजकूर आणि भाषणांकडे दुर्लक्ष केले.”
या वृत्तानंतर राहुल गांधींनी भाजपाला लक्ष्य केलं होतं. त्याचबरोबर भारतात फेसबुक व व्हॉट्स अॅप भाजपाच्या नियंत्रणात असल्याचा आरोप केला होता.
फेसबुकच्या प्रवक्त्यांनी शेवटी या वादावर खुलासा केला आहे, कोणचंही राजकीय वजन वा पक्षांशी संबंधाचा विचार न करता, आम्ही हिंसेला चिथावणी देणारी द्वेषयुक्त भाषणे व लिखाणाला प्रतिबंधित करतो. आम्ही हेच धोरण जागतिक पातळीवर अमलात आणतो. अचूकता व चांगुलपणा यांची निश्चितता करण्यासाठी आम्ही याच्या अंमलबजावणी संदर्भात प्रगतीवर आहोत आणि या प्रक्रियेचा नियमितपणे आढावा घेत आहोत, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
दरम्यान, त्या वादग्रस्त पोस्ट हटवण्यात आल्या आहेत.




