मुंबई : जलसंपदा विभागाच्या कामांची फाइल वित्त विभागाकडे पाठवण्यावरून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना धारेवर धरले. असेच काम चालणार असेल तर जलसंपदा विभागच बंद करा, असे उद्गारही त्यांनी काढले. दरम्यान यानंतर महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, आज याबाबत शिवेसना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महाविकास आघाडीत फूट असल्याचा दावा फेटाळून लावत संजय राऊत म्हणाले कि, “कोणत्या मंत्र्याने काय सांगितलं मला माहिती नाही. जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ते राज्याचे ज्येष्ठ नेते असून महाविकासआघाडी मधले महत्त्वाचे मंत्री, अनुभवी नेते आहेत. कॅबिनेट मध्ये काय घडलं याबाबत बाहेर सांगू शकत नाही. चर्चा झाली असेल काही. बाहेर कितीही कोणीही अफवा पसरविल्या तरी महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे, मजबूत आहे. कॅबिनेटमध्ये भांड्याला भांडे लागले असेल. पण आमची भांडी काचेची नाही ती फुटणार नाही किंवा त्याला तडा जाणार नाही.”
जयंत पाटील काय म्हणाले?
“राजकीय जीवनात काम करताना कुणावरही नाराजी धरायची नसते. तेवढ्यापुरता तो विषय असतो. एका विषयाची नाराजी दुसऱ्या विषयावर धरायची नसते. त्यामुळे कोणावर नाराजी हा प्रश्न उद्भवत नाही. तसेच मंत्रिमंडळातील चर्चा ही बाहेर सांगण्याची प्रथा नसते, त्यामुळे मंत्रिमंडळातील चर्चा बाहेर सांगण्याची आवश्यकता वाटत नाही,” असं सांगत जयंत पाटील यांनी सीताराम कुंटे यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केल्याच्या प्रश्नावर बोलणं टाळलं.




