मुंबई : औरंगाबादचे नाव बदलून संभाजी नगर करावे, अशी मागणी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना नेते अनिल परब यांनी केली आहे. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा होईल, अशी माहिती महाराष्ट्र मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली आहे.
औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याची मागणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. औरंगाबाद शहराचं नामकरण करुन संभाजीनगर केलं पाहिजे, असा प्रस्ताव अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. हा प्रस्ताव उद्याच्या बैठकीत मांडला जाईल, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला.
औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करण्याची शिवसेनेची जुनी मागणी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा गाजत आहे. आधी विकास, मग नामांतर असं म्हणत हा विषय पुढे ढकलला होता. मात्र ठाकरे सरकारवर अनिश्चिततेचे ढग घोंगावत असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.