राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सरकारी विमानाने प्रवास नाकारल्याने त्यांना खासगी विमानाने प्रवास करावा लागला. जाणीवपूर्वक राज्यपाल विमानात बसेपर्यंत परवानगी देण्यात आली नाही असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या सर्व आरोपांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
आतापर्यंतचं सर्वात अहंकारी सरकार असल्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “येथे अहंकाराचा प्रश्न कुठे येतो. नियम पाळणं अहंकार आहे का? ज्याप्रकारे कृषी कायद्यासंदर्भात केंद्र सरकार वागत आहे तो अहंकार नाही आणि नियमांचं पालन आहे तर मग राज्यपालांना नियमानुसार विमान मिळालं नाही हा अहंकार कसा असू शकतो?”.
“भाजपाला जर इतकं वाईट वाटत होतं तर त्यांचं विमान द्यायला हवं होतं. भाजपाकडे खूप व्यवसायिक विमानं आहेत. कोश्यारी भाजपाचे नेते आहेत. राज्यपालांचा अपमान व्हावा अशाप्रकारचं कोणतंही काम राज्य सरकार किंवा राज्याचे मुख्यमंत्री करणार नाहीत आणि केलंही नाही, तुम्ही जेव्हा वैयक्तिक कामासाठी आपल्या राज्यात जातात तेव्हा विमान वापरण्यासंदर्भात गृहखात्याचे काही निर्देश आहेत. त्या निर्देशांचं पालन राज्य सरकारने केलं आहे. महाराष्ट्र सरकारने संविधानाचा, कायद्याचा सन्मान राखला. जेव्हा जेव्हा राज्यपालांना सरकारी कामासाठी कोणतंही हेलिकॉप्टर, विमान हवं असेल तेव्हा ते सरकारने उपलब्ध करुन दिलं आहे. कोश्यारी गोव्याचेही राज्यपाल आहेत. तिथे भाजपाचं सरकार आहे, थोडा भार त्यांच्यावरही टाकायला हवा. यामागे कोणतंही राजकारण, सुडाची भावना नाही, असं राऊत यांनी सांगितलं.
“राज्यपालांचा आणि त्या पदाचा मान आणि प्रतिष्ठा राखण्याचं काम आम्ही करत असतो. आता राज्यपाल लोकनियुक्त सरकारचा आदर किती राखतात हे मला माहिती नाही, खासगी विमान असुरक्षित आहेत असं कोणी सांगितलं? जर कोविडचा विषय असेल तर राज्यपालांचं वय पाहता त्यांनी राजभवनाबाहेर पडणंच चुकीचं आहे. त्यांनी राजभवनात राहणंच सुरक्षित आहे,” असा सल्ला त्यांनी दिला.




