पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुंबईत एल्गार पुकारला आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा एक रुपयाही मिळाला नाही. या आणि अन्य मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी थेट अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान त्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. परंतु तुपकर यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले आहे. दरम्यान राज्य सरकारने याची दखल घेत वाशिम आणि बुलढाण्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. सरकारने दोन्ही जिल्ह्यातील 157 कोटींचा निधी मंजूर केला. पण हा निधी अपुरा असल्याचा दावा करत, तुपकर यांनी आंदोलनावर कायम असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे राज्य सरकारसमोरील पेच वाढला आहे.
दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांसह आज मुंबईकडे रवाना झाले. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे ते म्हणाले की, सोयाबीनला साडेबारा हजार तर कापसाला साडेआठ हजारांचा दर मिळावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. त्यानुसार ते आज शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. उद्या शेतकऱ्यांचा आवाज समुद्र किनारी घुमणार आहे. तसेच दिवसा विज देण्याच्या मुद्दावरही तुपकर ठाम आहेत.
24 नोव्हेंबरला शेकडो शेतकऱ्यांसह समुद्रात जलसमाधी आंदोलनाचा इशारा तुपकर यांनी दिला आहे. या आंदोलनापूर्वीच त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. अरबी समुद्रात असे आंदोलन होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. आता उद्या पोलीस काय कार्यवाही करतात आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्या पूर्ण होतात का? याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.