Shivshahir Babasaheb Purandare passed away

महान पर्वाचा अस्त! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

पुणे महाराष्ट्र

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पुण्यात निधन झाले. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यानच आज पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. साडे आठ वाजता पार्थिव पर्वती इथल्या निवासस्थानी ठेवण्यात येईल आणि सकाळी साडे दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती खालावली होती. त्यांना न्युमोनिया झाला होता, त्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बाबासाहेब पुरंदरे काही दिवसांपूर्वी घरात पाय घसरून पडले होते, त्यांच्या डोक्याला मार लागला होता, त्यानंतर त्यांना दिनानाथ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अलीकडेच पुरंदरे यांनी शंभरीत पर्दापण केले होते.

बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे असं त्यांचं पूर्ण नाव होतं. त्यांचा जन्म जुलै १९२२ मध्ये झाला होता. पुरंदरे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड होते. तरुणपणापासून ते पुण्यातच स्थायिक झाले. त्यानंतर भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेतून कामाला सुरुवात केली. पुणे विद्यापीठाच्या ’मराठा इतिहासाची शकावली- सन १७४० ते १७६१’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर २०१५ सालापर्यंत बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवलं. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.

बाबासाहेब पुरंदरे यांनी ऐतिहासिक विषयांवर ललित लेखन केलं. त्याचबरोबर त्यांनी नाट्यलेखन आणि जाणता राजा नाटकाचे दिग्दर्शन केले. 2015 मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर 2019 मध्ये पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरंदरे यांनी लिहिलेल्या जाणता राजा या महानाट्याचे राज्यभरात हजारो प्रयोग झाले. हे नाटक हिंदी आणि इंग्रजीसह इतर ५ भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत