नागपूर : बहिण-भावाचा नाल्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सोमवारी सकाळी हिंगण्यातील आमगाव देवळी येथे ही घटना घडली आहे. आरुषी विलास राऊत (वय १०) आणि अभिषेक विलास राऊत (वय ७) अशी मृत चिमुकल्यांनी नावे आहेत. हे दोघे मासे पकडण्यासाठी नाल्यात उतरले असता ही दुर्दैवी घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, या मृत भावंडांच्या आई-वडिलांचा मासेमारी हा पारंपारिक व्यवसाय आहे. रविवारी सकाळी हे दाम्पत्य कामावर निघून गेलं होतं. त्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्यांच्या मुलांनी नाल्यात मासे पकडायला जाण्याचे ठरवले. हे दोघेही गावातील नाल्याजवळ गेले आणि मासे पकडण्यासाठी नाल्यात उतरले. मात्र, त्या नाल्यात गाळ असल्याने दोघेही गाळात अडकले. नाल्याच्या आजूबाजूला कोणीही नसल्याने त्यांना कोणाची मदत देखील मिळाली नाही. त्यामुळे नाल्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला.
संध्याकाळी या मुलांचे आई-वडील कामावरून परतले असता त्यांना घरात मुले दिसली नाहीत. त्यानंतर तात्काळ दोघांचा शोध सुरू केला, मात्र ते सापडले नाहीत. सोमवारी सकाळी पुन्हा मुलांचे आई-वडील, नातेवाइक व गावकऱ्यांनी अभिषेक आणि आरुषीचा शोध सुरू केला. यावेळी त्यांना नाल्याजवळ अभिषेकचे कपडे आढळले. त्यानंतर हिंगणा पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे यांच्यासह पोलिस पथक गावात दाखल झाले. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने नाल्यात शोध घेतला, तेव्हा अभिषेक व आरुषीचे मृतदेह त्यांच्या हाती लागले. या घटनेमुळे राऊत कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.




