जालना : जालना शहरातील सोनलनगर भागात चारित्र्यावर संशय घेत मायलेकीचा खून केल्याची घटना सोमवारी सकाळी समोर आली आहे. पती, सवत व तिच्या मुलाने मारहाण करून भारती गणेश ऊर्फ संजू सातारे (३६) आणि वर्षा सातारे (१७) यांचा खून केला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत भारती सातारे यांची बहीण पंचशीला कदम यांनी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारती सातारे आणि वर्षा सातारे यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन गणेश ऊर्फ संजू सातारे, सवतीसह तिचा १६ वर्षांचा मुलगा या तीन जणांनी मारहाण केली होती. १५ दिवसांपासून ते या दोघींना मारहाण करत होते. या मारहाणीतच त्या दोघी मायलेकींचा मृत्यू झाला.
भारती ही गणेश सातारे याची दुसरी पत्नी होती. तिचे पूर्वी लग्न झालेले होते. पहिल्या पतीपासून तिला दोन मुली होत्या. एकीचे लग्न झालेले आहे, तर दुसरी मुलगी वर्षा होती. भारती यांचे गणेश सातारे याच्यासोबत लग्नापूर्वीपासूनच प्रेमसंबंध असल्याचे समजल्याने त्यांच्यापासून पहिल्या पतीने १५ वर्षांपूर्वीच घटस्फोट घेतला होता. त्यानंतर गणेश सातारे याने भारतीसोबत लग्न केले होते. भारती यांना गणेश सातारे याच्यापासून आठ वर्षांचा एक मुलगा आहे. आरोपी गणेश ऊर्फ संजू सातारे, त्याची पहिली पत्नी व तिचा १६ वर्षांचा मुलगा या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.




