अभिनेत्री कंगना रणौतने आज राजभवनात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. कंगना आणि शिवसेना असा वाद पेटला असतानाच बृह्नमुंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली होती. त्यावर राज्यपालांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कंगनानं आज राज्यपालांची भेट घेतली.
यावेळी कंगनाची बहीणदेखील उपस्थित होती. राज्यपालांच्या भेटीनंतर बोलताना कंगना म्हणाली, “राज्यपालांना मी एक नागरिक म्हणून भेटले. ते आपले सर्वांचे पालक आहेत. माझ्यासोबत जे घडलं, ते त्यांना सांगायला आले होते. त्यांनी माझं म्हणणं मुलीप्रमाणं ऐकून घेतलं. मला राजकारणाशी देणंघेणं नाही. मला आशा आहे की, मला न्याय मिळेल,” असं कंगनानं सांगितलं.




