मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) तिसरे समन्स बजावले आहे. देशमुख यांना ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. अनिल देशमुख या आधी दोन समन्म मिळूनही ईडीच्या कार्यालयात हजर राहिले नव्हते. माझे वय झाले असून मला काही आजार असल्याने आपण ईडीच्या कार्यालयात येऊ शकणार नाही. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशीसाठी मी तयार आहे, असेही देशमुख यांनी ईडीला कळवले होते.
ईडीने देशमुख यांना २५ तारखेला पहिले समन्स बजावले होते. त्यानंतर दुसऱ्या समन्सनंतर त्यांचे वकील ईडी कार्यालयात हजर राहिले होते. मात्र, आता देशमुख यांनी ईडीला हजर न होण्याची दिलेली सर्व कारणे बाजूला सारत ईडीने देशमुख यांना तिसरे समन्स बजावले आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्र लिहून अनिल देशमुख यांनी गृहमंत्री या नात्याने १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचे लक्ष्य दिल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी माजी पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचीही ईडीने चौकशी केली होती. अनिल देशमुखांनी पैशांचा गैरवापर केल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी ईडीने देशमुख यांच्या घरावर तसेच त्यांच्या संबंधितांच्या घरावर छापे टाकले होते.




