ठाणे : ठाण्यात शाहपूर तालुक्यातील आसनगाव फाट्याजवळील SKI कंपनीला भीषण आग लागली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही आग लागली असून ६ तासांनंतरही आग विझवण्यात यश मिळालेलं नाही. बिरौली गेटजवळील या कारखान्यात प्लॅस्टिकचे सामान बनविण्यात येते. आग इतकी भीषण आहे की घटनास्थळी आग विझविण्यासाठी २० पेक्षा जास्त अग्निशमन गाड्या पोहोचल्या असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न चालू आहेत.
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, कंपनीचे एकूण सात विभाग आहेत, त्यापैकी पाच विभाग पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी आले आहेत. दरम्यान, आगीची माहिती मिळताच सर्व कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. आगीत प्लास्टिक जळाल्यामुळे निघणारा काळा धूर आजूबाजूच्या परिसरात पसरला आहे. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार ती लेव्हल -3 ची आग आहे. आग विझविण्यासाठी कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी, आणि ठाणे येथून अग्निशमन दलाच्या गाड्या मागविण्यात आल्या आहेत.
या कारखान्यात रोजच्या वापरातील प्लास्टिक बॉक्स, बादल्या, टिफिन बॉक्स आणि घरगुती वस्तू तयार करण्यात येतात. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या कारखान्यात दिवस-रात्र शिफ्टमध्ये सतत काम सुरु असते. एका शिफ्टमध्ये 500 हून अधिक मजूर काम करत होते. सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.




