महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झालेला असून राज्यात पहिल्यांदाच रुग्णसंख्येची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली आहे. कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. राज्यात यापूर्वी १७ सप्टेंबर २०२० रोजी २४,८८६ इतकी उच्चांकी नोंद झाली होती. मात्र, काल (गुरूवार) कोरोना रुग्णसंख्येचे रेकॉर्ड मोडीत निघाले आहे.
काल राज्यात २५ हजार ८३३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ५८ जणांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णसंख्येत झालेली ही विक्रमी नोंद नक्कीच धक्कादायक आहे. राज्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांत नागपूरमध्ये सर्वाधिक ४५२३, मुंबईत २८७७, पुण्यात २७९१, औरंगाबादमध्ये 1२७४ तर पिंपरी-चिंचवडमध्ये १२७२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
महाराष्ट्रातील निम्म्यापेक्षा जास्त शहरांमध्ये नाईट कर्फ्यू, कडक लॉकडाउन आदी उपाययोजना लागू करून देखील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे राज्य सरकार आता नक्की कोणत्या उपाययोजना करणार, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.




