विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. एकाच दिवशी आलेले निकाल सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारेच आहेत, असं ते म्हणाले आहेत. न्यायालयालाही महाराष्ट्रद्रोही ठरवणार का? अशी विचारणा देखील त्यांनी केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरुन महापालिकेला फटकारलं असून दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी अटकेवरुन ठाकरे सरकारला फटकारलं आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “एकाच दिवशी देशातील दोन न्यायालयांचे निकाल एकाप्रकारे सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारेच आहेत. आता प्रश्न असा आहे की, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला सुद्धा हे ‘महाराष्ट्रद्रोही‘ ठरविणार का?”
“सत्तेतील नेते सत्तांध झाल्याने ज्या घटना अलीकडच्या काळात महाराष्ट्रात घडल्या, त्यावर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निकाल ही सरकारला सणसणीत चपराक आहे. सरकारविरोधी निघणारा प्रत्येक आवाज हा अशाप्रकारे चिरडून टाकता येत नसतो, हे आता तरी त्यांनी लक्षात घ्यावे,” असंही ते म्हणाले आहेत.
“आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आहे, याचा विसर या राज्य सरकारला पडला. पोलिस, फौजदारी कायदे हे जनतेच्या संरक्षणासाठी असतात, त्यांच्या छळवणुकीसाठी नाहीत, हे जर न्यायालयांना सांगावे लागत असेल, तर आपली सदसदविवेक बुद्धी-संविधानाला स्मरून घेतलेली शपथ गहाण ठेवली का,हा प्रश्न निर्माण होतो,” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आहे, याचा विसर या राज्य सरकारला पडला. पोलिस, फौजदारी कायदे हे जनतेच्या संरक्षणासाठी असतात, त्यांच्या छळवणुकीसाठी नाहीत, हे जर न्यायालयांना सांगावे लागत असेल, तर आपली सदसदविवेक बुद्धी-संविधानाला स्मरून घेतलेली शपथ गहाण ठेवली का,हा प्रश्न निर्माण होतो.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 27, 2020