नागपूर : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे सर्वपरिचित आहेत. अनेक सभा आणि कार्यक्रमांमधून नितीन गडकरींनी स्टेजवर केलेल्या भाषणात जोरदार टोलेबाजी केली आहे. अनेकदा तर त्यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारचे कान देखील टोचले आहेत. सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना गडकरी मागेपुढे पाहात नाहीत, असा त्यांचा इतिहास आहे. या पार्श्वभूमवीर नितीन गडकरींचं भाषण म्हणजे अशाच खुमासदार टोलेबाजीने भरलेली असणार, हे गणितच झालं आहे. नुकतीच गडकरींनी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना केलेली टोलेबाजी अशीच उपस्थितांचा हशा मिळवून गेली.
नितीन गडकरींनी नागपूरमध्ये झालेल्या अॅग्रो व्हिजन फाऊंडेशनच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात नितीन गडकरींनी शेतकऱ्यांना उत्पादन आणि बाजारपेठ यासंदर्भात मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना त्यांनी मालासाठी बाजारपेठेचं गणित कसं जुळवून आणायचं, यावर बोलताना केलेल्या टिप्पणीमुळे उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.
नितीन गडकरीं म्हटले कि, मी ठरवलंय की माझ्या गाडीतून दररोज माल रात्री १० वाजता भाजीमार्केटमध्ये येईल.. ६०० किलो, ८०० किलो. तो मला २५ रुपयांच्या वर रेट देतो. मला आरामात ३०-४० हजार रुपये दोन दिवसाला मिळतात. माझं मार्केट एस्टॅब्लिश झालं. आता मला भाजी विकायला अडचण नाही. मी माझं मार्केट स्वत:च शोधलं. तुमचं मार्केट तुम्ही शोधा. सरकार-बिरकार फार भरवशावर राहू नका यांच्या. मी सरकार म्हणून सांगतो तुम्हाला. अशा शब्दांत गडकरींनी यावेळी टोलेबाजी केली.
पुढे बोलताने ते म्हटले कि, फक्त परमेश्वरावर अवलंबून न राहाता स्वत: देखील प्रयत्न करावे लागतात, आपल्याकडे दोन गोष्टी आहे.. एक तर आपला विश्वास सराकारवर आहे किंवा परमेश्वरावर आहे. मुलगा झाला तर लगेच लोक म्हणतात, अरे वा, परमेश्वरानं दिला. आरे बाबा तुझं लग्न झाल्यानंतर तू पुढचा काही कार्यक्रम केला नसता तर मुलगा कसा झाला असता? परमेश्वर आवश्यक आहेच. पण तुझे प्रयत्नही आवश्यक आहेत ना असं गडकरींनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.




