औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात एक मोठा अपघात टळला. येथील गंगापूर तालुक्यात काल रात्री एका चालत्या एसटी बसला अचानक आग लागली. मात्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) अर्थात एसटीच्या बस चालकाने परिस्थिती अत्यंत सावधपणे हाताळली आणि बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले. घटनेच्या वेळी बसमध्ये 28 जण होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ढोरेगाव येथील नाशिकहून हिंगोलीकडे जाणाऱ्या एसटी बसला आज पहाटे एक वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत संपूर्ण बस जळून खाक झाली, मात्र सुदैवाने बसमधील 28 जणांना काहीही झाले नाही आणि सर्वजण सुखरूप बचावले.
नाशिक-हिंगोली बस रविवारी रात्री नाशिकच्या आगार क्रमांक-१ मधून निघाली. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास बस गंगापूर तालुक्यातील धोरेगाव येथे आली असता इंजिनमधून धूर येऊ लागला. हा प्रकार पाहताच चालकाने बस थांबवली. आग लागल्याचे समजताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, चालक आणि वाहकाने काळजीपूर्वक बसमधील २६ प्रवाशांना खाली उतरवले. सर्व प्रवासी खाली उतरून बसपासून काही अंतरावर सुरक्षित ठिकाणी गेले. यादरम्यान संपूर्ण बस आगीत जळून खाक झाली. आग एवढी भीषण होती की, पाहता पाहता आगीने संपूर्ण बसला कवेत घेतले. या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. सुदैवाने ड्रायव्हर आणि कंडक्टरसह सर्व 26 प्रवासी सुखरूप आहेत. दरम्यान, आगीची माहिती मिळताच एसटीचे अधिकारीही सतर्क झाले आणि त्यांनी घटनास्थळ गाठले होते.