बीजिंग : चीनने पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षाला आठ महिने उलटून गेल्यानंतर त्यांच्या ठार झालेल्या सैनिकांची नावे जाहीर केली. भारतासोबत झालेल्या संघर्षात चार लष्करी अधिकारी आणि जवान ठार झाले होते. तर, एकजण गंभीर जखमी झाला होता. त्यांनी त्यांच्या मृत्यू झालेल्या जवानांची माहिती का लपवली होती, यावर आता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण देखील दिले आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी शुक्रवारी याबाबत सांगितले की, गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर चीनने तणाव कमी करण्यासाठी संयम बाळगला होता. दोन्ही देशातील सैन्यामध्ये संबंध खराब होऊ नये यासाठी चीनने ठार झालेल्या आपल्या सैनिकांची नावे जाहीर केली नव्हती. चिनी लष्कराने जारी केलेला अहवाल अनेक वेळा वाचला. हा अहवाल वाचल्यानंतर मनाला वेदना झाल्या. यांपैकी चिनी जवान चेन होंगजून हा काही दिवसांमध्ये वडील होणार होता तर, शिआओ सियून हा लवकरच विवाह बंधनात अडकणार होता. मात्र, त्यांचा गलवान खोऱ्यात मृ्त्यू झाला. चीनच्या संप्रभुतेच्या रक्षणासाठी या दोघांनी प्राण दिले, असं त्यांनी सांगितलं.
वृत्तानुसार, ‘सेंट्रल मिलिटरी कमिशन ऑफ चायना’ने (CMC) काराकोरम रांगेत तैनात असलेल्या आणि जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारताविरुद्ध झालेल्या संघर्षात प्राण गमावलेल्या आपल्या पाच सैन्य अधिकारी-जवानांना श्रद्धांजली वाहिली.




