हरियाणाच्या नारनौल येथे एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. आज (१९ फेब्रुवारी) दुपारी रेल्वे अपघातात भिलवाराजवळ मालगाडी पलटली. या अपघातात सुमारे 39 डब्यांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, येथील रेल्वे ट्रॅकही तुटलेला आहे, परंतु अपघाताचे नक्की कारण अजून समजू शकलेले नाही. ही मालगाडी रेवाडी येथून फुलेराकडे जात होती,परंतु ती भिलवारा जवळील ट्रॅकवरून उतरून उलटली आहे.
रेल्वे अपघातामुळे सध्या या मार्गावरील गाड्यांची ये-जा थांबविण्यात आली आहे. मदतकार्य सुरू करण्यात आलं असून रेल्वे वाहतूक पथक व अन्य पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडीमध्ये एकूण ९० कंटेनर होते. अपघातानंतर हे कंटेनर सुमारे 50 मीटर खाली पडले. त्याचवेळी रेल्वे ट्रॅकही उखडला आहे. माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. मदतकार्य जलद गतीने सुरू आहे. सध्यातरी कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही. जुन्या रेल्वे रुळावरून मालगाडी येत होती. या ट्रॅकवर प्रवासी गाड्याही प्रवास करतात. अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासन रेल्वे लाइन दुरुस्त करून सेवा पूर्ववत करण्यात व्यस्त आहे.




