प्रसिद्ध वेशभूषाकार भानू अथय्या यांचे निधन झाले आहे. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. भानू अथय्या या ९१ वर्षांच्या होत्या. भानू अथय्या यांनी भारताला पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवून दिला होता.
भानू अथय्या यांचे पूर्ण नाव भानुमती अण्णासाहेब राजोपाध्याय होते. त्यांचा जन्म २८ एप्रिल १९२९ रोजी कोल्हापुरात झाला होता. त्यांनी १९५६ साली सुपरहिट सिनेमा सीआयडी साठी वेशभूषाकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. रिचर्ड एटनबरो यांच्या १९८२ मध्ये आलेल्या ‘गांधी’ सिनेमासाठी भानू अथय्या यांचा सर्वोच्च पुरस्कार ऑस्करने सन्मान करण्यात आले. भानू अथय्या यांनी आमिर खानच्या ‘लगान’, शाहरुख खानच्या ‘स्वदेस’ आणि श्रीदेवीच्या ‘चांदणी’ सिनेमातही वेशभूषाकार म्हणून आपली प्रतिभा दाखवली होती.
भानू अथय्या यांनी जवळपास १०० सिनेमांमध्ये वेशभूषाकार म्हणून काम केले आहे. त्यांनी अनेक दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. ज्यामध्ये गुरुदत्त, यश चोपडा, बी. आर. चोपडा, राज कपूर, विजय आनंद, राज खोसला, आशुतोष गोवारिकर, कोनार्ड रूक्स आणि रिचर्ड एटनबरो यांच्या सारख्या नावांचा समावेश आहे. भानू अथय्या यांना गुलजार यांच्या ‘लेकीन’ (१९९०) आणि आशुतोष गोवारिकर यांच्या ‘लगान’ (२००१) या सिनेमांसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.




