जळगाव : रावेर तालुक्यात बोरखेडा शिवारातील एका शेतात असलेल्या घरात अज्ञातांनी चार चिमुकल्या भावंडांची निर्घृणपणे हत्या केल्याच्या घटनेमुळे अवघा जळगाव जिल्हा हादरला. ही खळबळजनक घटना आज (शुक्रवारी) सकाळी उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरापासून काही अंतरावर बोरगाव शिवारात शेख मुश्ताक यांचे शेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेख यांच्या शेतात मयताब भिलाला हे आपली पत्नी, दोन मुली आणि तीन मुलांसोबत राहतात. १५ ऑक्टोबर रोजी भिलाला हे पत्नी आणि एका मुलासह नातेवाइकांच्या दशक्रिया विधीसाठी मध्य प्रदेशात गेले होते. त्यांनी दोन मुले आणि दोन मुली यांना घरीच ठेवले होते.
शुक्रवारी सकाळी शेतमालक शेख मुश्ताक हे शेतात आल्यावर त्यांना घर बंद दिसले. त्यामुळे त्यांनी आवाज देत डोकावून पाहिले असता, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण घरात भिलाला यांची चारही मुले सविता (वय १४), राहुल (वय ११), अनिल (वय ८) व नाणी (वय ५) हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. कुऱ्हाडीने वार करून चारही भावंडांची निर्घृणपणे हत्या केल्याचे स्पष्ट झाले. ही घटना समोर आल्यानंतर शेख यांनी तातडीने रावेर पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे पोहोचले. पोलिसांनी काही लोकांचे जबाब नोंदवले आहेत. हत्याकांडामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.




