राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाईन शिक्षण पद्धती अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत. शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना परंपरागत पद्धतीने मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाधिवक्ता व संबंधित यंत्रणेशी अकरावी प्रवेशासंदर्भात चर्चा करून लवकरच प्रवेशाचा मार्ग मोकळा केला जाईल. कॉलेज सुरू व्हावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे विलंब होतो आहे परंतु ऑनलाईन अकरावी वर्गाला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे याबद्दल वर्षा गायकवाड यांनी समाधान व्यक्त केले.
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दिवाळीच्या काळात कोणत्याही परीक्षांचे आयोजन करू नये अशा सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक रूची वाढावी व त्यांचे ज्ञानभांडार समृद्ध करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील राहील, असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत व्यस्त. शाळा बंद, तरी शिक्षण सुरू. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार- शालेय शिक्षणमंत्री @VarshaEGaikwad pic.twitter.com/NfQMwAS42u
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 4, 2020