पाटणा : बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यात एका पत्रकाराची काही हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. सांखो गावात ही घटना घडली. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच पत्रकाराचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. मृत पत्रकार सुभाष कुमार हे त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य होते. या घटनेबाबत पत्रकारांनी संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 20 मे रोजी संध्याकाळी पत्रकार सुभाष कुमार त्यांच्या गावात आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. कार्यक्रमाला उपस्थित राहून ते रात्री घरी परतत होते. दरम्यान, वाटेत अगोदरच थांबलेल्या हल्लेखोरांनी सुभाष कुमार यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांची सुभाष कुमार यांच्या डोक्यात गोळी मारली. डोक्यात गोळी लागल्याने पत्रकार सुभाष कुमार जमिनीवर कोसळले. गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.
लोकांनी तात्काळ सुभाष कुमार यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच परिहार पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. परिहार पोलिस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक नवीन कुमार यांनी सांगितले की, सुभाष कुमार यांच्या हत्येबाबत स्वतंत्रपणे तपास सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा दावा त्यांनी केला. हल्लेखोरांची संख्या तीन असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुभाष कुमार यांनी बखरी परिसरात वाळू आणि दारू माफियांविरोधात सतत बातम्या चालवल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सुभाष यांच्या हत्येमागे वाळू आणि दारू माफियांचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या पोलीस संशयाच्या आधारे तिन्ही हल्लेखोरांना अटक करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. या घटनेबाबत पत्रकारांनी संताप व्यक्त करत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.




