नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या अडीच लाखांच्या पुढे आढळत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव प्रभावी पर्याय असल्याचं तज्ज्ञां मत आहे. त्यामुळे देशातील सर्वांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात यावी अशी मागणी होत होती. यावर केंद्र सरकारने मोठा निर्यण घेतला असून 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोनावरील लस देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 45 वर्षांपुढील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत होती. 1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनावरील लस मिळेल. कोरोनावर मात करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचं म्हटलं जातंय.
लशीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फक्त फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात येत होती. त्यानंतर लशीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात वय वर्षे 60 च्यावरील तसेच वय वर्षे 45 च्या वरील सहव्याधी असणाऱ्या लोकांच्या लशीकरणास सुरवात करण्यात आली होती. दरम्यान, लशीच्या निर्यातीपेक्षा भारतातील सर्वांचं लशीकरण करावं, अशी मागणी नरेंद्र मोदींकडे करण्यात येत होती. याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील मोदींना आवाहन केलं होतं की, सर्वांना लस देण्यात यावी. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून 25 वर्षे वयावरील सर्वांना लस देण्यात यावी अशी मागणी केली होती. अखेर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होण्याची आशा आहे.




