Tokyo Olympics : देशाचा आघाडीचा कुस्तीपटू रवी दहिया ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणारा भारताचा दुसरा कुस्तीपटू ठरला आहे. कठोर परिश्रम, अनेक वर्षांचा संघर्ष आणि त्यागाच्या जोरावर त्याला क्रीडा क्षेत्रात ही मोठी कामगिरी करता आली. परंतु, रवीसाठी हा प्रवास खूपच अवघड होता.
रवी दहियाचे वडिल स्वत: दररोज छत्रसाल स्टेडियमवर दूध आणि लोणी घेऊन जात असत. यासाठी ते रोज 120 किलोमीटरचा प्रवास करायचे. ते रोज पहाटे 3.30 वाजता उठायचे, पाच किलोमीटर चालत जाऊन जवळच्या रेल्वे स्थानकावर जायचे. तेथून रेल्वेने आझादपूर आणि नंतर येथून दोन किलोमीटर चालत छत्रसाल स्टेडियमवर जायचे. पुन्हा घरी पोहोचल्यानंतर शेतात काम करायचे. हे सर्व तब्बल 12 वर्षे अविरत चालू होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर यात अडथळा आला होता. परंतु, आज रवीने रौप्यपदक जिंकून या कष्टाचे चीज केले.
24 वर्षांचा रवी स्वभावाने अतिशय शांत आणि लाजाळू आहे. त्याचे वडील राकेश कुमार यांनी त्याला वयाच्या 12व्या वर्षी छत्रसाल स्टेडियममध्ये पाठवले, तेव्हापासून तो महाबली सतपाल आणि प्रशिक्षक वीरेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. एका खाजगी वृत्त वाहिनीशी बोलताना रवीची आई म्हणाली की, एक महिनाभरापासून रवीशी बोलणं झालं नाही. त्याचा आवाज ऐकला नाही. या माऊलीचा मुलाविषयीचा अभिमान स्पष्ट दिसत होता. त्यानंतर भावना अनावर झाल्याने त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
कझाकिस्तानचा खेळाडू कुस्तीपटू रवी दहियाच्या हाताला कडाडून चावला, तरीही रवीने पकड ढिली पडू दिली नाही




