आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ च्या २५व्या सामन्यात यजमान अमेरिका आणि भारत यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने यजमान अमेरिकेवर ७ विकेट्सनी मात करत सलग तिसरा विजय मिळवला. त्याचबरोबर भारत टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ फेरीत पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे. या सामन्याात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना अर्शदीपच्या शानदार कामगिरीच्या (४ विकेट्स) जोरावर अमेरिकेला ११० धावांवर रोखले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना सूर्यकुमार आणि शिवमने भारताला १८.२ षटकांत विजय मिळवून दिला.
सुरुवातीच्या धक्क्यातून सावरलेल्या भारतीय संघाने सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांच्या दमदार भागीदारीच्या जोरावर टी-२० विश्वचषकाच्या अ गटातील सामन्यात अमेरिकेचा सात गडी राखून पराभव करून सुपर एट टप्प्यासाठी पात्र ठरले आहे. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने २० षटकांत आठ गडी गमावून ११० धावा केल्या. प्रत्युत्तरात सौरभ नेत्रावळकरने भारताला सुरुवातीला दोन धक्के दिले, पण सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतक झळकावून संघाला सावरले आणि दुसऱ्या टोकाला शिवम दुबेने त्याला चांगली साथ दिली. या दोन फलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे भारताने १८.२ षटकांत तीन गडी गमावून ११ धावा करून विजय मिळवला. भारताचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय असून त्याने सहा गुण घेत सुपर ८ मध्ये स्थान निश्चित केले आहे.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून अमेरिकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले परंतु वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात अमेरिकेला दुहेरी धक्का दिला. ज्यातून संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. अमेरिकेकडून नितीश कुमारने सर्वाधिक २७ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताची सुरुवातही चांगली झाली नाही आणि विराट कोहलीच्या रूपाने संघाने पहिली विकेट गमावली. कोहली खाते न उघडताच बाद झाला. यानंतर सौरभने भारतीय कर्णधार रोहित शर्मालाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. एकेकाळी संघ संकटात सापडलेला दिसत होता, पण सूर्यकुमार आणि शिवमने जबाबदारी सांभाळली आणि भारताला विजयापर्यंत नेले. सूर्यकुमार यादव ४९ चेंडूंत दोन चौकार व दोन षटकारांच्या मदतीने ५० धावा करून नाबाद राहिला तर शिवम दुबे ३५ चेंडूंत एक चौकार व एका षटकाराच्या मदतीने ३१ धावा करून नाबाद राहिला.
टीम इंडियाने अमेरिकेविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजी केली. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगसाठी न्यूयॉर्कची खेळपट्टी वरदान ठरली. त्याने टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारतासाठी सर्वात शानदार गोलंदाजी केली. त्याने सामन्यातील पहिल्याच चेंडूवर अमेरिकेचा फलंदाज शायान जहांगीरला एलबीडब्ल्यू करून पॅव्हेलियनमध्ये पाठवत ऐतिहासिक कामगिरी केली. तो टी-२० विश्वचषकात भारतासाठी सामन्यातील पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा पहिला आणि जगातील चौथा गोलंदाज ठरला आहे. अर्शदीपने आपल्या ४ षटकात केवळ ९ धावा देत ४ विकेट्स घेत अनेक विक्रम केले. त्याचवेळी हार्दिक पंड्यानेही दोन विकेट्, घेतल्या. अशा प्रकारे भारताने अमेरिकन संघाला ११० धावांवर रोखले.
सुपर ८ मध्ये जाण्यासाठी पाकिस्तान संघासाठी अमेरिकेला भारताकडून हरावे असे समीकरण होते. भारतीय संघाने यजमान अमेरिकेचा पराभव केल्याने पाकिस्तानच्या सुपर ८ मध्ये जाण्याच्या आशा कायम आहेत. पाकिस्तान संघाला पुढच्या टप्प्यात जायचे असेल तर आयर्लंडविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. यासोबतच, अमेरिकेला त्याच्या ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात आयर्लंडकडून पराभव पत्करावा लागतो.




