मुंबई : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने देशांतर्गत होणाऱ्या सर्व वयोगटांच्या क्रिकेट स्पर्धा रद्द केल्याची घोषणा केली आहे. आयपीएल २०२१ प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच टी २० सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यापासून म्हणजेच १६ मार्च पासून स्टेडियममध्ये प्रेक्षकांना बंदी घालण्यात आली आहे.
सध्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांचे आंतरराष्ट्रीय सामने सुरू आहेत. या सामन्यांसाठी कोविड प्रोटोकॉल अंतर्गत खेळाडूंना बायो बबलमध्ये राहावे लागत आहे. मर्यादीत आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी बायो बबल शक्य आहे. मात्र देशांतर्गत पातळीवर खेळणाऱ्या शेकडो खेळाडूंसाठी ते शक्य नाही. त्यामुळे कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले.




