अंतिम वर्षांच्या परीक्षांसंबंधी सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वाचा निकाल दिला आहे. परीक्षा होणारच असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, तसंच राज्य परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाही असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. पुण्यातील बाणेर येथील कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रसारमाध्यमांसी बोलत होते.
“सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकार आणि युवासेनेने जी याचिका केली होती ती फेटाळली आहे. परीक्षेशिवाय पदवी देऊ शकत नाही हे सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे. देशभरातील कुलगुरुंचंही हेच मत होतं. जी कमिटी तयार करण्यात आली होती त्यांनीही हाच रिपोर्ट दिला होता. तरीही केवळ युवासेनेच्या आग्रहाखातर महाराष्ट्र सरकार सातत्याने एकतर्फी निर्णय़ घेत होतं. त्याचा भविष्यात आमच्या मुलांवर परिणाम झाला असता. आज परीक्षा नाही याचा कदाचित काही लोकांना आनंद झाला असता पण भविष्यात त्यांची पदवी काही कामाची राहिली नसती. सुप्रीम कोर्टाने तेच सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्णय दिला असल्याने विद्यार्थ्यांचा फायदाच होईल, तोटा होणार नाही. त्यांच्या पदवीला मूल्य असेल. मूल्य नसणारी पदवी त्यांना प्राप्त करावी लागणार नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.




