मुबई : उद्धव ठाकरे सरकारने अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी घेतलेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावं बदलण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यासोबतच नवी मुंबई विमानतळाला देखील दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. मात्र, हे निर्णय नवीन सराकर फिरवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये नव्या सरकारतर्फे यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ‘सह्याद्री’वर झालेल्या बैठकीनंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या निर्णयांची मागिती देण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हटले कि, आज मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय मावळत्या सरकारचे जबाबदारी झटकणारे निर्णय नाहीत. उगवत्या सूर्याच्या साक्षीने सरकारने जबाबदारी स्वीकारून घेतलेले निर्णय आहेत. या निर्णयांचा नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेला फायदा होईल.
दरम्यान, नामांतराबाबत नव्या सरकारने घेतलेल्या निर्णयाविषयी सांगताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधीच्या ठाकरे सरकारवर टीका केली. ते म्हटले कि, २९ जूनला अल्पमतातल्या सरकारने काही निर्णय घाई-गडबडीने घेतले. पुढे त्यावर कायदेशीर बाबी निर्माण होऊ नये, म्हणून हे प्रस्ताव फेरसादर करण्याचे आदेश आम्ही दिले होते. आज नामांतरासंदर्भातल्या फेरप्रस्तावांना रीतसर मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार, औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद शहराला धाराशिव तर नवी मुंबई विमानतळाला नाव लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असं नाव देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी जाहीर केलं.
त्यानंतर बोलताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले कि, यासंदर्भातला ठराव विधानमंडळ मंजूर करेल आणि त्यानंतर ते केंद्राकडे मान्यतेसाठी आम्ही पाठवू. त्याचा पाठपुरावा करून ते देखील आम्ही लवकरात लवकर मंजूर करून घेऊ.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटले कि, एमएमआरडीए मोठ्या प्रमाणावर प्रकल्प राबवते आहे. शिवडी-न्हावाशेवा हा देखील मोठा प्रकल्प आहे. असे प्रकल्प राबवताना त्यांनी ६० हजार कोटींचं कर्ज उभारण्यास मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यात पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या १२ हजार कोटींसाठी शासन हमी देखील देण्यात आली आहे. जेणेकरून प्रकल्पांना निधी कमी पडणार नाही.
Cabinet Briefing.#Maharashtra #Mumbai https://t.co/9Fa15zmhC1
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 16, 2022
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झालेले महत्त्वाचे निर्णय :
- मावळत्या सरकारचे जबाबदारी ढकलणारे नाही तर उगवत्या सूर्याचे जबाबदारी स्वीकारणारे निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतले आहेत.
- औरंगाबाद शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर‘ असे नामकरण, उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामकरण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव ‘लोकनेते स्व. दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ‘ आणि एमएमआरडीएला ₹60,000 कोटींचे कर्ज घेण्यास मंजुरी आज मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.
- एमएमआरडीएच्या कर्जाला 12,000 कोटी रुपयांची शासकीय हमी देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला.
- थेट नगराध्यक्ष निवडीत पैशाची खेळी करता येत नाही, हे लक्षात आल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने तो निर्णय रद्द ठरविला होता.




