उत्तराखंड : उत्तराखंड उच्च न्यायालयाने चारधाम यात्रेवरील बंदी उठवली आहे. तथापि, या काळात प्रवाशांना कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन करावे लागेल. गुरुवारी सरन्यायाधीश न्यायमूर्ती आर एस चौहान आणि न्यायमूर्ती आलोक कुमार वर्मा यांच्या विभागीय खंडपीठाने प्रवासावरील बंदी उठवण्यासाठी सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली. यावेळी न्यायालयाने चारधाम यात्रेवरील बंदी उठवली आहे.
सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले की, राज्यातील कोरोना महामारी आता नियंत्रणात आहे, लोकांना कठोरतेने कोरोना नियमांचे पालन करायला लावले जात आहे. अशा परिस्थितीत प्रवासाला परवानगी दिली जाऊ शकते. तसेच, चारधाम यात्रा ही स्थानिक लोकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे.
असे असतील नियम :
- याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या एसओपीनुसार बद्रीनाथमध्ये दररोज येणाऱ्यांची संख्या 1200 वरून 1000 पर्यंत कमी केली. केदारनाथमध्ये 800, गंगोत्रीमध्ये 600 आणि यमुनोत्रीमध्ये 400 यात्रेकरूंना एका दिवसाच्या यात्रेची परवानगी देण्यात आली आहे.
- हेलिकॉप्टर आणि प्रवास मार्गावर सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्था या जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच काम करू शकतील.
- यात्रेसाठी आरटीपीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल किंवा लसीच्या डोसचे प्रमाणपत्र आवश्यक असेल.
- भक्त कोणत्याही कुंडात स्नान करू शकणार नाहीत.




