नवी दिल्ली : दिल्लीतील नोयडामध्ये अतिशय संतापजनक घटना घडली आहे. भाजीच्या हातगाडीचा दुचाकीला धक्का लागल्यामुळे दोन दुचाकीस्वारांनी 15 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी ग्रेट नोयडा परिसरातून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
हा मुलगा गरीब परिस्थितीमुळे कुटुंबाला हातभार लावण्यासाठी भाजा विकण्याचे काम करत होता. तो भाजी विकण्यासाठी नेहमीप्रमाणे शहरात आला होता. यावेळी दोन दुचाकीस्वार ललित आणि आशिष भाजी खरेदी करण्यासाठी मुलाच्या भाजीच्या हातगाडीजवळ थांबले. यावेळी मुलाच्या हातगाडीचा धक्का दुचाकीला लागून दुचाकी खाली पडली. आपल्या गाडीला धक्का लागून गाडी खाली पडली, याचा राग अनावर होऊन दुचाकीस्वारांनी मुलाला मारहाण करायला सुरुवात केली. त्यांनी मुलाला बेदम मारहाण केली, त्याच्या डोक्याला एवढी गंभीर इजा झाली की हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर काही वेळातच मुलाचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनास्थळी अन्य भाजी विक्रेतेही होते. त्यांनी या आरोपींना रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु आरोपींनी या सगळ्याला न जुमानता 15 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केली. मुलाला जबर मारहाण करून त्यांनी तिथून पळ काढला. या मुलाच्या हत्येच्या आरोपावरुन दिल्ली पोलिसांनी ग्रेट नोयडा परिसरातून दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. दोन्ही आरोपींविरोधात आयपीसी कलम 304 (हत्येसाठी दोषी) , 323 (मारहाण करणे), 504 (जाणूनबुजून अपमान करणे) अशी कलमे लावली आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.




