आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे सणानिमित्त बकऱ्याचा बळी दिला जात होता, मात्र यावेळी बकऱ्याऐवजी ज्या व्यक्तीने बकऱ्याची मान धरली होती, त्याचीच मान कापली गेली.
आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे ही भयंकर घटना घडली आहे. वृत्तानुसार, येथील वलसापल्ले येथील मंदिरात संक्रांतीनिमित्त बलिदानाचा विधी केला जात होता. येथील लोक दरवर्षी संक्रांती उत्सवात प्राण्यांचा बळी देतात आणि स्थानिक येल्लम्मा मंदिरात अर्पण करतात. नेहमीप्रमाणे यावेळीही हा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी एक बोकड आणण्यात आला होता आणि त्याचा बळी द्यायचा होता. मात्र यादरम्यान कार्यक्रमात जे काही घडले त्यामुळे एकच खळबळ उडाली. बकऱ्याचा गळा कापणाऱ्याचे नाव चलापथी असून बकऱ्याला धरणाऱ्याचे नाव सुरेश आहे. बळी देण्याची प्रक्रिया सुरू असताना चलापथीने बकऱ्याऐवजी सुरेशचा गळा कापला. त्याची मान कापताच तो रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला.
एका अहवालात पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, आरोपीने दारूचे सेवन केलेले होते आणि तो दारूच्या नशेत होता. दरम्यान, सुरेशला जवळच्या मदनपल्ले येथील शासकीय रुग्णालयात नेले, मात्र त्याचा मृत्यू झाला. आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत सुरेश विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. चलापथीचा सुरेशसोबत काही वाद होता का, याची पोलीस चौकशी करत आहेत. पुढील तपास सुरू करण्यात आला असून चौकशी सुरू आहे.




