राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिलं. यावेळी भाषणात ते म्हणाले कि, आंदोलनजीवी जमात उदयास आली आहे. या जमातीपासून सावध राहण्याची गरज आहे. हे आंदोलनजीवी परजीवी आहेत, ते कुणाचंही आंदोलन सुरू असेल तिथे घुसतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, ‘आपण सगळेच काही शब्दांशी परिचीत आहोत, श्रमजीवी, बुद्धीजीवी असे शब्द आपल्याला माहीत आहेत. परंतु, मी पाहतोय कि, गेल्या काही दिवसांपासून देशात एका नव्या जमातीचा जन्म झाला आहे. ती आहे ‘आंदोलनजीवी’ जमात. वकिलांचं आंदोलन सुरू आहे, तिथे ही जमात जाणार. विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, तिथेही दिसणार. मजुरांचं आंदोलन सुरू आहे, तिथेही दाखल होणार. कधी पडद्याच्या मागे तर कधी पडद्याच्या समोर.’
‘ही संपूर्ण टोळीच आंदोलनजीवी आहे. ते आंदोलनाशिवाय जगू शकत नाहीत. आपण अशा लोकांना ओळखायला हवं. या जमातीपासून सावध राहायला हवं. हे आंदोलनजीवी लोक कधीही स्वत: आंदोलन करत नाही, परंतु, कुणाचंही आंदोलन सुरू असेल तिथे घुसतात. हे आंदोलनजीवी परजीवी आहेत, जे प्रत्येक ठिकाणी भेटतील,’ अशी टोलेबाजी पंतप्रधान मोदींनी केली आहे.




