उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सोमवारी आला. न्यायालयाने आशिष मिश्राचा जामीन रद्द केला आहे. यासोबतच आशिष मिश्राला जामीन देणारा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश सुप्रीम कोर्टाने बाजूला ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण नव्याने सुनावणीसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात परत पाठवले.
सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ४ एप्रिल रोजी सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. 10 फेब्रुवारी रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने या प्रकरणात आशिष मिश्रा यांना जामीन मंजूर केला होता. त्यापूर्वी तो चार महिने कोठडीत होता.
काय आहे प्रकरण?
गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी येथे एका कारने चार शेतकऱ्यांना चिरडले होते, तेव्हा शेतकऱ्यांच्या एका गटाने भाजप नेते केशव प्रसाद मौर्य यांच्या विरोधात आंदोलन केले होते. संतप्त आंदोलकांनी भाजपचे दोन कार्यकर्ते आणि एका ड्रायव्हरला बेदम मारहाण केली, तर एका स्थानिक पत्रकाराचाही या हिंसाचारात मृत्यू झाला. आशिष मिश्रा हे आंदोलकांना चिरडणाऱ्या वाहनात होते, असा दावा शेतकरी नेत्यांनी केला आहे. मात्र, मिश्रा यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.




