राजस्थान : राजस्थानमधील नागौर येथे श्रीबालाजीजवळ मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मध्य प्रदेशातील 12 जणांचा मृत्यू झाला असून 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. नोखा बायपासवर जीप आणि ट्रेलर यांच्यात भीषण धडक झाली. सर्व मृत हे मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील सज्जन खेडा आणि दौलतपूर गावातील रहिवासी असल्याचे सांगितले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार, या 12 सीटर जीपमध्ये 18 लोक बसलेले होते. रामदेवरा येथे दर्शन घेतल्यानंतर हे सर्व लोक देशनोक करणी माता येथे दर्शन घेऊन मध्य प्रदेशला निघाले होते. दरम्यान, नागौरहून नोखाकडे जाणारा ट्रेलर आणि जीप यांच्यात जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालयात नेत असताना तीन जणांचा मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनेक लोकांचे मृतदेह जीपमध्येच अडकून पडले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक तेथे पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला या अपघाताची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले.




