मुंबई : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, भारतात लोकशाही आहे. लोकशाहीत आपण मतदार प्रतिनिधींची निवड करत असतो. त्यामुळे प्रतिनिधींनी जबाबदारीचं भान ठेवून वागायला हवं. पूजा चव्हाण प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हायला हवी. कायद्या समोर सर्वजण समान असतात. उदयनराजे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घ्यायला आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
उदयनराजे भोसले म्हणाले कि, “राजेशाही जाऊन आता देशात लोकशाही आली आहे. लोकशाहीत आपण आपले प्रतिनिधी निवडून देत असतो. आपल्या मतांवर आमदार, खासदार निवडून येतात. त्यामुळे अशा नेत्यांनी जबाबदारीचं भान ठेवून वागायला आणि बोलायला हवं. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात जर संबंधित व्यक्ती जबाबदार असेल तर तत्काळ त्यावर कडक कारवाई व्हायलाच हवी. त्याठिकाणी उदयनराजे असतील तरी कारवाई ही व्हायलाच हवी. कायद्यासमोर सर्वजण समान असतात.”
राज ठाकरेंच्या भेटीचं कारण विचारलं असता उदयनराजे म्हणाले, “आमच्या घरात लवकरच एक लग्न आहे. त्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत जवळपास 1 तास राज ठाकरे यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा झाल्या. सध्या पत्रिका देण्याच्या निमित्ताने सर्व राजकीय पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी मी घेत आहे.”
मराठा आरक्षणाबाबत उदयनराजे म्हणाले की, “मराठा आरक्षण प्रश्नी कोणत्याही प्रकारचे राजकारण होऊ नये अशी विनंती मी शरद पवार यांना केली आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला मी स्वतः तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण आणि समितीतील सदस्य देखील उपस्थित असतील. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयात सरकार कोणती रणनीती अवलंबणार आहेत याबाबत चर्चा होणार आहे. मराठा समाजाची मागणी रास्त आहे. इतर समाजाला ज्या पद्दतीने आरक्षण मिळालं त्याच पद्यतीने मराठा समाजाला देखील आरक्षण मिळावं अशी माझी इच्छा आहे.”




