सध्या बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यातच भाजपानं प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावरून मोठं वादंग निर्माण झालं आहे. भाजपानं करोनाची लस मोफत देण्याची घोषणा केली, याच मुद्यावरून भाजपावर जोरदार टीका होत असून, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
संजय राऊत म्हणाले कि, “जिथे जिथे भाजपाचं सरकार नाही, तिथे करोनाची लस मिळणार नाही का?, हे सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे. मोदींचं भाषण ऐकलं, त्यात घराघरापर्यंत लस कशी पोहोचेलं याची तयारी सुरू असल्याचं म्हटलं आहे. जिथे भाजपाचं सरकार असेल, जिथे भाजपालाच मतदान केलं जाईल, त्यांनाच लस मिळेल हा संशोधनाचा विषय आहे. जेव्हा आम्ही शाळेत जायचो त्या काळात, तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा, अशी घोषणा होती. मात्र, आता तुम मुझे वोट दो, हम तुम्हे वॅक्सीन देंगे, अशी घोषणा दिली जात आहे. म्हणजे जे मत देणार त्यांनाच लस देणार, ही क्रूरता आहे. निर्घृणता आहे. मध्य प्रदेशातही हेच बोललं जात आहे. मग आता देशाची विभागणी करण्याची तयारी सुरू आहे का? हे चांगलं नाही.”
“नोकऱ्याचं आश्वासन समजू शकतो. अन्न, वस्त्र, निवारा हे समजू शकतो. पण लशीचा मुद्दा राजकारणासाठी आणि निवडणुकीसाठी वापरण्यात आला आहे. याला आमचा आक्षेप आहे. अशा प्रकारच्या प्रचारामुळे पंतप्रधान मोदींची बदनामी होत आहे, असं मला वाटतं. हे मोदीजींच्या प्रतिमेला ठेच पोहोचवणारे वक्तव्य आहे,” असं राऊत म्हणाले.




