उपमुख्यमंत्री अजित पवार थकवा जाणवत असल्याने राहत्या घऱी क्वारंटाइन झाले आहेत. मात्र ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानातून त्यांचे कार्यालयीन कामकाज नियमित सुरु आहे. ते आवश्यकतेनुसार व्हीसी व दूरध्वनीद्वारे अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा, मदतकार्याचा आढावा घेत आहे. याशिवाय फाईल्स पुढे पाठवणे, कार्यालयीन कामं नियमित व सुरळीत सुरु असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
अजित पवार यांना करोना झाल्याचं वृत्त पार्थ पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना फेटाळलं. दरम्यान अजित पवार यांच्या सर्व बैठका तसंच सकाळी होणारा जनता दरबार रद्द करण्यात आला होता. यावेळी कोणतंही कारण सांगण्यात आलं नव्हतं.
बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी राष्ट्रवादीकडून ट्विट करत अजित पवार पक्ष कार्यालयात होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाहीत असं सांगितंल होतं. अजित पवारांनी हे ट्विट रिट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये सांगण्यात आलं होतं की, “राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काही अपरिहार्य कारणास्तव गुरूवार, २२ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध राहू शकणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी”




