ठाणे : ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व इथे डोंगर परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कळवा पूर्व येथील घोळाई नगर डोंगर परिसरात घरांवर दरड कोसळल्याने चार घरांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाकडून घटनास्थळी बचाव आणि शोधकार्य सुरू आहे.
या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून यात तीन लहान मुलांचा समावेश आहे. यात रविकिशन (12 वर्षे), सिमरन (10 वर्षे) आणि संध्या (३ वर्षे) यांचा समावेश आहे. प्रभू यादव (वय 45) आणि विद्यावती (वय 40) यांचाही मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. 5 वर्षांची प्रीती आणि 18 वर्षीय अचल यांना वाचवण्यात यश मिळाले आहे.
दरम्यान, मागील तीन दिवसांपासून ठाण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. ठाण्यानजीक असणारा मासूंदा तलाव ओसंडून वाहू लागला आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचून पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत.




