‘जागतिक आरोग्य संघटनेला काय कळतं? ती सीबीआयसारखीच आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) म्हणजे इकडून तिकडून गोळा केलेल्या माणसांचा एक गट आहे. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले म्हणून काय झालं? खरंतर डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नाही. कम्पाउंडरकडून औषध घेतो. त्यांना जास्त कळतं. तुम्ही त्या WHO वाल्यांच्या नादाला लागू नका. त्यांच्यामुळंच करोना वाढलाय,’ असं वक्तव्य संजय राऊत यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं.
करोनाच्या काळात जीव धोक्यात घालून डॉक्टर करत असलेल्या कामाचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. असं असताना संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळं नवा वाद निर्माण झाला आहे.
राऊत यांच्या या वक्तव्याला भारतीय जनता पक्षानं तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘करोनाच्या संकटात डॉक्टर हे देवदूत म्हणून काम करत आहेत. त्यांच्याबद्दल राऊत यांनी असं वक्तव्य करणं म्हणजे डॉक्टरांचा फार मोठा अपमान आहे. त्यामुळं राऊत यांनी राज्यातीलच नव्हे देशातील डॉक्टरांची जाहीर माफी मागावी,’ अशी मागणी भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.




