भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील खर्डी गावात सोमवारी रात्री उशिरा झालेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी (वय अंदाजे 35) आणि त्यांचा सहकारी तेजस तांगडी यांची धारदार शस्त्रांनी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. रात्री साधारण 11 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे गावात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रफुल्ल तांगडी आपल्या दोन सहकाऱ्यांसह ‘जे डी टी इंटरप्रायसेस’ या त्यांच्या कार्यालयात बसले होते. अचानक चार ते पाच हल्लेखोर तेथे आले आणि कोणताही वाद न घालता त्यांनी थेट धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. हल्ल्याच्या वेळी प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी यांना वारंवार वार करण्यात आले. गंभीर जखमी झाल्याने दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्लेखोरांनी हल्ला करून तात्काळ घटनास्थळावरून पलायन केले.
या घटनेतील एक धक्कादायक बाब म्हणजे, सुमारे वर्षभरापूर्वी प्रफुल्ल तांगडी यांच्यावर अशाच प्रकारचा जीवघेणा हल्ला झाला होता. त्या वेळी ते कसेबसे बचावले होते. मात्र, या वेळेस हल्लेखोरांनी त्यांचा जीव घेतला. त्यामुळे या हत्येच्या मागे जुन्या वादाची किंवा राजकीय वैमनस्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच भिवंडी तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन बर्वे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात हल्लेखोरांची संख्या चार ते पाच असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
हत्या राजकीय की वैयक्तिक कारणातून?
प्रफुल्ल तांगडी हे भाजप युवा मोर्चाचे सक्रिय कार्यकर्ता आणि जिल्हा उपाध्यक्ष असल्याने, या हत्येमागील कारणाबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. हत्या वैयक्तिक वैमनस्यातून झाली की राजकीय सूडातून, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, संशयितांविषयी महत्त्वाच्या धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या दुहेरी हत्येमुळे खर्डी आणि परिसरात तणावाचे वातावरण असून, नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.




