मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी राज्यात साडे पाच हजाराच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळून आले. राज्यातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या ४५० च्या वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून 30 डिसेंबरला रात्री उशिरा नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.
नव्या नियमावलीनुसार 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून राज्यात नवे निर्बंध लागू असणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचे संकेत गुरुवारी संध्याकाळी दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्बंधांबाबत अंतिम निर्णय घेतील, असं ते म्हणाले होते. त्यानुसार गुरुवारी रात्री उशिरा राज्य सरकारकडून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यापूर्वी राज्य सरकारकडून घालण्यात आलेले अन्य निर्बंध कायम राहतील.
नवे निर्बंध
- बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागेतील लग्न समारंभासाठी फक्त 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी
- सर्व प्रकारचे सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी मग ते बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागी असतील, अशा कार्यक्रमांना 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
- अंत्यविधीसाठी 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
- पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, रिकामी मैदाने आदी ठिकाणी कलम 144 लागू
- परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा
आरोग्यमंत्री राजेश टोपे गुरुवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की 31 डिसेंबरच्या अनुषंगाने आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर इतकंच सांगेन की, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष कोरोनापासून मुक्ती असणारं वर्ष असावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. गर्दी टाळावी, संसर्ग होईल असं कुठलंही कार्य करू नका. कोरोना नियमावलीचं पालन करा.




