पुणे : नागरिकांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या पुणे महानगरपालिका प्रशासनाचा निषेध म्हणून सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली नऱ्हे धायरी रस्त्यावरील कृष्णाईनगर येथे तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तब्बल चार तास वाहतूक ठप्प राहिल्याने नागरिकांनीही प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
या अगोदरही मोरे यांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये गुलाबाचे झाड लावून गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन केलं होतं. मात्र, प्रशासनाने याची कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळेच धायरी फाटा – नऱ्हे मार्गावर चक्काजाम करत प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी प्रचंड वाहतूक कोंडी झाली. तीन तास उलटूनही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिरंगाईची भूमिका घेतल्यामुळे मोरे आणि स्थानिक नागरिक संतप्त झाले. अखेर पाच तासांनंतर पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर चक्काजाम मागे घेण्यात आला.

यावेळी प्रभाग अधिकारी विजय वाघमोडे आणि उपयुक्त श्रद्धा पोतदार यांनी मोरे यांच्या मागण्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. नऱ्हे परिसरातील ड्रेनेज लाईन, रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा या विषयांवर त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मोरे यांनी मागणी केली. अन्यथा, भविष्यात मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
सदर आंदोलनस्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दायगुडे, वाहतूक विभागाचे राजकुमार बर्डे, तसेच सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे अभियंते निशिकांत छापेकर, शुभम देशमुख हे उपस्थित होते.
मोरे यांच्या या आंदोलनाला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला. राजाभाऊ जाधव, मिलिंद मराठे, संजय सुर्वे, गणेश निंबाळकर, विठ्ठल सूर्यवंशी, हरीश वैद्य, प्रशिक दारुंडे, लतिफ शेख, सुनील पडेर, सुरज दांगडे, सुशील भागवत, विशाल खरात, बोराडे, अजय घारे, सोनाली नायर यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक आंदोलनात सहभागी झाले.
“प्रशासनाकडे वारंवार विनंती करूनही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. गांधीगिरी करूनही दखल घेतली गेली नाही. म्हणूनच नाईलाजास्तव नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरलो. समस्या लवकर न सुटल्यास बेंगळुरू-मुंबई महामार्ग रोखण्याचा निर्णय अटळ असेल.” — भूपेंद्र मोरे, सामाजिक कार्यकर्ते




