पुणे : जुन्नर तालुका हद्दीत नगर – कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. ओतूर परिसरातील कोळमाथा या ठिकाणी पिकअपने एकाच वेळी एका पायी जाणाऱ्या युवतीला आणि दुचाकीवर चाललेल्या पती-पत्नीला धडक दिली. या अपघातात दोनही महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा अशोक डुंबरे (वय १९) आणि सविता गीताराम तांबे (वय ४५) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. गीताराम नामदेव तांबे (वय ५२) हे जखमी झाले आहेत. जखमी आणि मृत व्यक्तींची घरे महामार्गाच्या जवळच आहेत.
ऋतुजा डुंबरे ही रस्त्यावरून घरी चालत जात होती, तर गीताराम नामदेव तांबे व पत्नी सविता तांबे हे दोघे पती-पत्नी आळेफाट्याच्या दिशेने मोटारसायकलवरून जात होते. यावेळी भरधाव वेगात चाललेल्या पिकअप एम. एच. १४ के. ए ५१३७ हा कल्याणच्या दिशेने जात होता. ओतूर परिसरातील कोळमाथा येथे असणाऱ्या दत्तभेळ हॉटेलसमोर रस्त्याने चाललेल्या युवतीला आणि दुचाकीवर चाललेल्या पती पत्नीला पिकअपने धडक दिली. अपघातानंतर पिकअप रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पलटली. अपघातानंतर चालक पिकअप तिथेच सोडून घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी ओतूर पोलीस अधिक तपास करत आहेत.




