‘महाराष्ट्रात जे काही ऑक्सिजन उत्पादित करणारे प्लांट आहेत, त्यात उत्पादन होणाऱ्या ऑक्सिजनपैकी ८० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा हा अन्य उद्योगांना होत होता, तर केवळ २० टक्केच ऑक्सिजनचा पुरवठा मेडिकलसाठी केला जात होता. आता त्यात बदल करून एकूण ऑक्सिजन उत्पादनाच्या ८० टक्के पुरवठा आता मेडिकलसाठी व २० टक्के पुरवठा उद्योगांसाठी करावा, असे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात करोना बाधित व अन्य रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही. ऑक्सिजनचे उत्पादन होणारी जी ठिकाणे आहेत, तेथून प्रत्येक जिल्ह्यात व्यवस्थित ऑक्सिजन पोहोच व्हावा, यासाठी एक ‘वॉर रूम’ तयार केली आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा येण्याचे कारण नाही,’ असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
‘ऑक्सिजन उत्पादन संबंधी पुण्याला अंत्यत मोठा प्लांट हा आठ दिवसांच्या आत उत्पादनाला सुरुवात करेल. तो जेव्हा सुरू होईल, तेव्हा खूप मोठ्या पद्धतीने उत्पादनाचे काम होऊ शकेल व अजिबात अडचण राहणार नाही. तूर्त ऑक्सिजनची कोणतीही अडचण नाही. आपण ऑक्सिजनची स्थिती स्थिर करीत आहोत,’ अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.




