मुंबई : गृह मंत्रालयाने मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून याबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास यापूर्वी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) करत होतं. मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला सापडला होता. मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता.
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे. एनआयए आतापर्यंत केवळ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास करत होती. तर ATS मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि स्कॉर्पिओ गाडी प्रकरणाचा तपास करत होते. मात्र आता केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर तिन्ही केसचा तपास एनआयए करणार आहे.




