रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपचे खासदार राजीव चंद्रशेखर हे ‘अर्णव गोस्वामी यांच्यासह भागीदार होते. गोस्वामी हे भाजपसाठी काम करतात म्हणूनच देवेंद्र फडणवीस सरकारनं अन्वय नाईक यांचं आत्महत्या प्रकरण दाबलं,’ असा घणाघाती आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात ‘रिपब्लिक टीव्ही’चे मालक, संपादक अर्णव गोस्वामी यांना झालेल्या अटकेनंतर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी व भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अन्वय नाईक व ठाकरे कुटुंबांमध्ये जमीन व्यवहार झाल्याची माहिती पुढं आणली आहे. नाईक कुटुंबीयांनी हे सगळे व्यवहार खुले असल्याचं म्हटलं आहे. अर्णव गोस्वामी यांना पाठिशी घालण्यासाठी सोमय्या हे आरोप करत आहे,’ असं आज्ञा नाईक यांनी म्हटलं आहे.
सचिन सावंत यांनी याप्रकरणी टीका करत म्हटले आहे कि, ‘अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा व जमीन व्यवहाराचा संबंध काय? मराठी कुटुंबाची वाताहत झाली त्याचे सोमय्या यांना काहीही पडले नाही. नाईक यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात किरीट सोमय्या यांनी त्यांच्या जमीन व्यवहाराला मध्ये आणून आपली व भाजपची हीन मानसिकता दर्शवली. रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपचे खासदार राजीव चंद्रशेखर हे भागीदार होते. गोस्वामी यांचा भाजपशी थेट संबंध आहे. फडणवीस सरकारने आत्महत्या प्रकरण दाबले कारण आरोपी भाजपशी संबंधित आहे. भाजपसाठी काम करतो. भाजप हा पक्ष महाराष्ट्र द्वेष्टा आहे हे स्पष्ट आहे,’ असं देखील सावंत यांनी म्हटलं आहे.