मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. येत्या 31 जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीच्या शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ असताना मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगितलं जातंय. पहिली ते आठवीच्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या होत्या. मात्र पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी शाळांबाबत अखेर निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा ऑनलाईन शाळा सुरु राहणार आहेत.

आजपासून लहान मुलांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आजच किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा आढावा घेतला होता. राज्यातील रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास इतर जिल्ह्यांमध्ये देखील असा निर्णय घेतला जाऊ शकतो.




