ठाणे : दंड न भरल्यास 1 डिसेंबरपासून विशेष मोहीम राबवून गाड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांनी या वर्षभरात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दंडात्मक चलान फाडून जवळपास 22 कोटी रुपयांची चलान फाडले आहेत. त्यात जवळपास 13 कोटी रुपयांची वसुली झाली नसून आता ती रक्कम भरण्यासाठी चालकांना दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
गाड्या ताब्यात घेण्यापासून ते गाडी परवाना निलंबनाचीही कारवाई करण्याचा इशारा वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे. त्याचबरोबर पत्रिपूलाच्या गर्डर लॉन्चिंगसाठी चार दिवस घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमध्ये वाहतुकीचे नियमन करण्यात येणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाईचा आकडा मोठा असला तरी वाहन चालक दंडच भरत नाहीत. त्यामुळे दंडाची थकबाकी वसूल करण्यासाठी वाहतूक शाखेने प्रयत्न सुरु केले आहेत. येत्या दहा दिवसांमध्ये प्रलंबित असलेल्या ई चलानची रक्कम भरण्याची मुदत चालकांना देण्यात आली आहे.




